पुणे -जागेची मालकी बदलली तरी पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबाकीची वसुली करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यानुसार, एखाद्या जागेच्या पूर्वीच्या मालकाने थकविलेले वीजबिल नंतरच्या नवीन मालकाकडून वसूल करण्याच्या सूचना महावितरणने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
महावितरणच्या पुणे परिमंडळांतर्गत वीजबिलांच्या थकबाकीसह विविध कारणांमुळे एकूण 2 लाख 66 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे 417 कोटी 52 लाख रुपयांची थकबाकी असून, ती वसूल करण्यासाठी कायमस्वरुपी खंडित वीजजोडण्यांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत जागेच्या पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने थकविलेल्या वीजबिलाची थकबाकी नंतरच्या मालक किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. जुनी वीजबिलाची थकबाकी वसूल केल्याशिवाय नवीन वीजजोडणी देण्यास नकार देण्याचे अधिकार वीज वितरण कंपन्यांना आहेत. त्याविरोधात वीजबिलाची थकबाकी असलेली जागा खरेदी केलेल्या नव्या मालकांनी न्यायालयात धाव घेतली होती.
पुणे परिमंडळातील स्थिती
2 लाख 66 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित
417 कोटी 52 लाख रुपये ग्राहकांकडील थकबाकी