येरवडा – घर बांधताना नियम डावलुन बांधले गेले असुन यामुळे येण्या-जाण्यास रस्ता नाही, अशा तक्रारी शेजारी राहणाऱ्यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केली होती. मात्र, तक्रार करणाऱ्यांसह चारही घरे नियम डावलून बांधली गेली असल्याने या चारही घरावर येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने मोठी कारवाई करुन नियमबाह्यपणे बांधलेले बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली.
येरवडा गणेशनगर बीएसयुपी योजनेमध्ये जगदीश सोळंकी, राजेंद्र भगत, उषा चव्हाण, पारसदास रांका यांनी घरे बांधली होती. या घरांवर वाढीव बांधकाम केल्याची तक्रार महापालिका तसेच राज्य मानवी हक्क आयोगाकडे करण्यात आली होती. याची दखल घेत आयोगाने महापालिकेला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परीमंडळ – १ च्या उपायुक्तांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये तक्रारदारांसह अन्य घरेही नियमबाह्य असल्याचे उघड झाले, याचा अहवाल महापालिकेने आयोगाला सादर केला.
त्यानुसार चारही घरांचे नियमबाह्य बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने मोठा फौज फाटा लावुन नियमबाह्य बांधकाम पाडले. या कारवाईत उपायुक्त किशोरी शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय नाइकल, उपभियंता चंद्रसेन नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता अभिषेक कुसाळकर, निरीक्षक धनंजय नेवसे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक तेजस दाभाडे, अय्युब शेख, वामन सुद्रिक, राकेश काची यांनी सहभाग घेतला.
“राज्य मानवी हक्क आयोगाने तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चारही घरांचे बांधकाम नियमबाह्य पद्धतीने केल्याचे निष्पन्न झाले होते. कारवाई करण्यापूर्वी संबधितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या.” – विजय नाइकल, सहाय्यक आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय