सातारा – हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सातारा शहर परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही ऐन थंडीत पावसाची रिपरिप सुरु होती. हा अवकाळी पाऊस अक्षरशा नकोसा वाटत असून बोचरे वारे, थंड वातावरण आणि धुसूर वातावरणामुळे भर दिवसाही वाहन चालकांना वाहनाचे दिवे लावूनच ये जा करावी लागत होती. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे मोठे वातावरण पसरले असून हा पाऊस हा पिकांसह फळबागांनाही मोठा धोका निर्माण करणारा ठरत आहे.
मागील दोन आठवडे तापमानाचा पारा घसरत चालला असताना थंडीचा कडाका वाढत होता. त्यातच ज्वारी सारख्या पिकांवर चिकटा रोग वाढून येत होता. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठा बदल जाणवत असून यामुळे आजारपणातही वाढ झालेली आहे .
सर्दी, पडसे, खोकला, शिंका यामुळे सातारकर हैराण झाल्याचे दिसून येत आहे. हा अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे ढगाळ वातावरणात द्राक्ष, डाळिंबा सारख्या फळबागानाही मोठा फटका बसत असून ज्वारी ,गहू, हरभरा या पिकांवरही मोठा परिणाम होणार असल्याची चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. दिवसभर बोचऱ्या वाऱ्यामुळे शहरातील वाहतूक आणि जनजीवन तसे विस्कळीत झाल्याचे दिसून येत होते. विशेष करून सध्या बहरलेल्या आंब्याच्या मोहराला या पावसाने मोठा फटका दिला असून अनेक मोठ्या झाडांवरील आंबा मोहोर गळल्यामुळे आता ऐन उन्हाळ्याच्या हंगामात आंबा पीक मिळणार की हातचे जाणार अशी चिंता आंबा उत्पादक शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.