प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 23 -मानवनिर्मित संकटांचा सामना करण्याच्या दृष्टीने इमारतीच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा नियंत्रण नियमावली तयार करण्यासाठी शासनाने मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. स्फोटकांपासून इमारतीचे सरंक्षण तसेच आणीबाणीच्या वेळी इमारतीमधील लोकांचे स्थलांतर करण्यासाठीच्या तरतुदी सुचविणे हे काम समितीचे असणार आहे. ही समिती दोन महिन्यांत नगर विकास विभागास अहवाल सादर करणार आहे.
मानवनिर्मित संकटांचा सामना करण्याच्या दृष्टीने इमारतीच्या सुरक्षेसाठी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली तसेच एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली यामध्ये विशेष सुरक्षा नियंत्रण नियमावलीचा समावेश करण्यासाठी फेरबदल करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला एप्रिल 2022 मध्ये आदेश दिले होते. त्यानुसार शासनाने ही समिती नेमली आहे. या समितीमध्ये नगर रचना विभागाचे संचालक नो. रा. शेंडे, प्रॅक्टीसिंग इंजिनिअर्स, आर्किटेक्ट ऍण्ड टाऊन प्लॅनर्स असोसिएशनचे प्रतिनिधी संदीप ईसोरे, मुंबई महापालिकेचे विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता यांचा समावेश आहे. याबाबतचा शासन निर्णय नगर विकास विभागाचे अवर सचिव निर्मलकुमार चौधरी यांनी प्रसिद्ध केला आहे.
विशेष नियंत्रण नियमावली अमलात असलेल्या नियमावलीमध्ये नमूद असलेल्या कोणत्या प्रकारच्या इमारतींना लागू करता येईल, याबाबत शिफारस ही समिती करणार आहे. पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या इमारतींना सदरची विशेष नियंत्रण नियमावली लागू करण्याबाबत तपशिलवार उपायोजना सुचविणार आहे. तसेच या समितीने विविध विषयांचे तज्ज्ञ, दहशतवादी विरोधी पोलिस विभागातील तज्ज्ञ अधिकारी, अग्निशमन विभागातील अधिकारी आदींशी समन्वय साधून आवश्यक ती माहिती घेण्यात यावी. आवश्यकतेनुसार विविध इमारती, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे.