प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 23 -ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते राज्यातील 3 हजार 943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.
यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष प्रसाद, वर्ध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, “”राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या करण्यात आल्या आहेत. अभ्यास गटाचे संशोधन आणि विश्लेषण तसेच शासन निर्णयाची अचूकता, पारदर्शकता आणि सर्व संवर्गासाठी लावलेल्या योग्य निकषानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली असून, या बदल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय शंभर टक्के स्वयंचलित पद्धतीने करण्यात आल्या आहेत.”
दरम्यान, आंतरजिल्हा बदल्यांसाठी एकूण 11 हजार 871 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 3,943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या 34 जिल्हा परिषदेअंतर्गत करण्यात आल्या आहेत. एकूण अर्जांपैकी 33 टक्के बदल्या करण्यात आल्या आहेत.
आंतरजिल्हा बदलीसाठी एका जिल्ह्यात 10 वर्षे, त्यापैकी एका शाळेत किमान 5 वर्षे सलग सेवा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षाघात व अन्य दुर्धर आजाराने ग्रस्त, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका, परित्यक्ता तसेच वयाची 53 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा बदलीमध्ये समावेश आहे. पती-पत्नी एकत्रिकरणाकरिता विशेष संवर्ग समाविष्ट आहे.