स्थायी समितीचे माजी सदस्य आक्रमक : माजी अध्यक्षांच्या कार्यालयात गोंधळ
पुणे – महापालिका स्थायी समितीमधील आर्थिक “देवाण-घेवाणी’च्या सुरस कथा पुणेकरांना नवीन नाहीत. मात्र, महापालिकेची मुदत संपून दहा महिने झाल्यानंतर आता एका माजी अध्यक्षांच्या कार्यालयात समिती माजी सदस्यांनी आपल्या कालावधीत झालेल्या निविदांच्या मान्यतांचा “हिशेब’ मागत थेट हिस्सा देण्याची मागणी केली. एका महिला सदस्याने आक्रमक भूमिका घेत थेट या गोष्टीचा गवगवा करण्याचीच धमकी दिली. त्यामुळे या माजी अध्यक्षांच्या कार्यालयात एकच गोंधळ उडाला.
यानंतर माजी अध्यक्षांनी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याकडे हिशेबाबाबत बोट दाखविले. तर, या पदाधिकाऱ्याने “आधीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला विचारा,’ असे सांगत या सदस्यांची कोंडी केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्थायी समितीमधील “टक्केवारी’चा गोंधळ शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, स्थायी समितीत सर्वच राजकीय पक्षांचे सदस्य असतात. त्यामुळे या प्रकारावरून सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी “कानावर हात’ ठेवले आहेत.
या दबक्या आवाजातील चर्चेनुसार, मनपा स्थायी समितीत गेल्या काही वर्षांत अनेक मोठे प्रकल्प मंजूर झाले आहेत. हजारो कोटींचे हे प्रकल्प असून, या प्रकल्पांना मान्यता देताना “टक्केवारी’ची रक्कम समितीच्या सदस्यांना अद्याप दिलेली गेली नाही. “ही रक्कम समितीची मुदत संपल्यानंतर दिली जाईल. ती निवडणुकीसाठी वापरता येईल,’ असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, महापालिकेची मुदत संपल्यानंतर या सदस्यांकडून “टक्केवारी’चा हिशेब मागण्यास सुरूवात झाली. मात्र, निवडणुका येताच तुम्हाला योग्य वेळी पैसे दिले जातील. कोणीही काळजी करू नये,’ असे समजाविण्यात आले. मात्र, त्यानंतरही काहीच होत नसल्याने आता हाती काहीच पडणार नाही, याची कुणकुण लागल्याने या सदस्यांचा संयम सुटत आहे.
काही दिवसांपूर्वी या सदस्यांनी या माजी अध्यक्षांना घरीच गाठत सकाळीसकाळी पैशांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी “वरिष्ठांशी चर्चा करून सांगतो’ असे सांगत वेळ मारून नेली. मात्र, मंगळवारी या सदस्यांनी पुन्हा या पदाधिकाऱ्याला गाठत “टक्केवारीचा हिशेब’ कधी देणार, याचा जाब विचारला. तसेच या प्रकरणी “आमचे पैसे नाही मिळाले तर आम्ही वरिष्ठांना निनावी पत्र देऊ’ अशीच धमकी दिली. ही बाब काही वेळातच राजकीय वर्तुळात पसरली. त्यामुळे दिवसभर महापालिकेच्या राजकीय वर्तुळात या टक्केवारीची चर्चा चांगलीच रंगली होती. तसेच शहराचा विकास कसा साधला जातो, याची प्रचितीही पुणेकरांना पुन्हा एकदा आली.