कोथरूड, दि. 19 (प्रतिनिधी) -मुंबई-पुणे-सातारा महामार्गावरील एनडीए-चांदणी चौकातील रस्ता रूंदीकरणाच्या कामासाठी येथून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक अर्धा ते एक तासासाठी बंद ठेवण्यात येते. “एनएचएआय’कडून रस्ता अचानक बंद केला गेल्याने चौकातील सर्वच रस्त्यांवार वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत आहेत. वाहतूक अचानक बंद केली जात असल्याने चालकांसह गाडीतील लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच वयोवृद्ध प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. “काम सुरू; रस्ता अचानक बंद’ याचा अनुभव वाहन चालकांना वारंवार येत आहे. रस्ता रूंदीकरणाच्या या कामाचा पॅटर्न आगामी काळात “चांदणी चौक पॅटर्न’ म्हणून राज्यभरात राबविला गेल्यास
नवल वाटायला नको, अशी स्थिती
चांदणी चौक रस्त्याचे रूंदीकरण होत असले तरी या चौकाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक तसेच स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. काम पूर्ण झाले नसेल तर रस्ता बंद ठेवावा तसेच वाहन चालकांना पर्यायी रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी संतापजनक मागणी वाहन चालकांकडून होऊ लागली आहे. रस्त्याचे काम करायचे असल्यास तसेच वाहतूक बंद ठेवायची असल्यास “एनएचएआय’ने पत्र प्रसिद्ध करावे, अशी मागणी होत आहे. याउलट सुरवातील रात्री बारानंतर वाहतूक काहीशी कमी असल्याने बंद ठेवण्यात येणारा रस्ता आता ठेकेदारांकडून भरदुपारच्यावेळी बंद ठेवला जात असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
…म्हणून वाहतूक कोंडी
कोथरूड, वारजेकडून मुंबई, मुळशीकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ अधिक आहे. मात्र, चार ते पाच लेनवरून येणारी वाहने वेदभवन येथील उड्डाणपुलाखालील दोन लेनमधून पुढे येतात. तसेच, वेदभवन समोरील रस्ता तीव्र चढाचा आहे. त्यामुळे याठिकाणी सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत आहे. चांदणी चौकातील कामानिमित्त रस्ता बंद वेदभवन, एनडीए रोड आणि चांदणी असा एक ते दीड किलोमिटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.
बावधन रोड ब्लॉक…
चौकातील कामामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. या परिसरात शाळा, महाविद्यालय, कंपन्यांची संख्या अधिक असल्यामुळे सकाळ-संध्याकाळ वाहनांची वर्दळ अधिक असते. त्यामध्ये चांदणी चौकातून बावधनकडे जाण्यासाठी “एनएचएआय’ कार्यालयापासून यु-टर्न घ्यावा लागतो. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. वेदभवनकडून एनडीएकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि वेदभवन येथे महामार्गावरून बावधनकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.
भुलभुलय्या रस्त्यांमुळे चालक हैराण…
चांदणी चौकातील रस्त्याच्या कामामुळे कोणता रस्ता कधी बंद होईल, वाहतूक कोणत्या रस्त्याने कुठे वळवली जाईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे आज ज्या मार्गाने गेलो तर दोन दिवसांनी तोच मार्ग असेल याची खात्री नाही. सोयीनुसार वाहतूक वळवली जात असल्यामुळे येथील भुलभुलय्या रस्त्याला वाहनचालक वळसा घालत असतात. तेच नवख्या चालकाची “घुमते रहो जायोगे’, अशी स्थिती होते.