आंबेगाव बुद्रुक, दि. 19 (प्रतिनिधी) -महानगरपालिकेत 2017 मध्ये आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द या गावांचा समावेश झाला. पालिकेत समावेश झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांत कोणतेही महत्त्वाचे विकासकाम, योजना या भागात झालेली नाही. उपनगरीय या भागात मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येचा विचार करता पाच पटीने लोकसंख्या वाढली आहे. परंतु, त्यानुसार या भागाला मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत. रस्ते, ड्रेनेज लाइन, पाण्याच्या लाइन ग्रामपंचायत काळापासून जशाच्या तशाच आहेत. याउलट केवळ वाढीव कर प्रणालीसह पाणीपट्टी पालिका वसूल करीत आहे.
आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द , गावठाण, तुकाराम नगर, नऱ्हे रोड, धबाडी परिसर, सिंहगड कॉलेज, सहें नंबर 15 व 16 या भागात पाण्याची प्रचंड टंचाई असून सोसायट्यांना लाखो रुपये खर्च करून टॅंकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर, पाण्याच्या लाइन नसून देखील महापालिका गेल्या पाच वर्षांपासून दोन टक्के प्रमाणे पाणीपट्टी नागरिकांकडून वसूल करीत आहे. या भागातून जाणाऱ्या पाणीपट्टीच गेल्या पाच वर्षांतील रक्कम लक्षात घेतली तरी या परिसरासाठी पाणी पुरवठा योजना राबविता आली असती. परंतु, पालिकेकडून याकडे दुर्लक्षच केले गेले.
महानगरपालिकेला या भागातून मोठा कर मिळत असेल तर मग पालिकेकडून विकासासाठी निधी अद्यापपर्यंत का मिळाला नाही? पालिकेकडून निधी मिळवण्यासाठी या भागाचे लोकप्रतिनिधी कमी पडले का? असा सवाल नागरिक करीत आहेत.
– युवराज वासवंड, माजी सरपंच, आंबेगाव बुद्रुक