पुणे – शिक्षण हे संस्कारासाठी, मूल्य संवर्धनासाठी, कौशल्य विकसित करण्यासाठी असावे. जगामध्ये भारताला ज्ञानसत्ता बनविण्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण असावे, तसेच वसुधैव कुटुंबकम्ची भावना मुलांमध्ये रुजवावी, असे मत पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) प्राचार्या डॉ. नेहा बेलसरे यांनी व्यक्त केले आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी इयत्ता ९ वी ते १२ पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. येरवडा विभागातील प्रशिक्षण सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर विद्यानिकेतन शाळेत हे प्रशिक्षण झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रभाकर क्षीरसागर उपस्थित होते.
डॉ. नेहा बेलसरे व डॉ. प्रभाकर क्षीरसागर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे व ध्येय यांचा आढावा घेतला. शिक्षकांनी आपले ज्ञान बदलत्या काळानुसार अद्ययावत ठेवावे. यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानाचा अध्ययनात उपयोग करावा, असे डॉ. प्रभाकर क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
डायटच्या विषय साधन व्यक्ती सुनीता दळवी व सुशीला गालिंदे यांनी प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. मुक्तीराम शेळके, नितीन माने, संजय भांगरे, शबाना अरब, शारदा मते यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. समारोपाच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.