प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -“ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी असलेले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आणि संग्रहालयाच्या माध्यमातून आपल्या क्रांतिकारकांनी केलेली कामगिरी नव्या पिढीला कळेल. तरुणांना प्रेरणा देणारी ही वास्तू असून, हे भवन पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखले जाईल,’ असा विश्वास पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केला.
“इंद्राणी बालन फाऊंडेशन’द्वारे नूतनीकरण करण्यात आलेल्या हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपतीच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन व संग्रहालयाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. इंद्राणी बालन फाउंडेशच्या उपाध्यक्षा आणि आरएमडी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. जान्हवी धारिवाल-बालन यांनी स्वत: लक्ष घालून हे भवन आणि संग्रहालयाचे नूतनीकरण केले.
यावेळी प्रसिद्ध ब्लॉगर व शेफ जुगनू गुप्ता, मंडळाचे उत्सव प्रमुख, विश्वस्त व युवा उद्योजक पुनीत बालन, मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, आरएमडी फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन, उपाध्यक्षा शोभाताई धारिवाल यांच्यासह मानाच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुप्ता दाम्पत्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती केली. त्यानंतर कलश, शाल व श्रीफळ देऊन गुप्ता दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
भवनामध्ये आहे ऐतिहासिक ठेवा…
क्रांतिकारकांचे माहेरघर असलेल्या या भवनात गुप्त दालन, भुयारी रस्ते, ब्रिटीशकालीन ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, “ईस्ट इंडीया कंपनी’ची पेटी व वाड्याला असलेली सेंट्रल लॉकिंग सिस्टीम इत्यादी आकर्षणांबरोबरच पर्यटकांसाठी ऑडिओ व व्हिडिओ क्लिपही असणार आहे. हे भवन पाहताना जुन्या काळातील वाड्यांची बांधणी, सुसज्जता दिसून येते. हे भवन सर्वांसाठी विनाशुल्क खुले असणार आहे.
वर्षभरापूर्वी मी हे भवन पाहिले होते. आता नूतनीकरणानंतर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ वास्तू झाली आहे. आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि क्रांतिकारकांनी केलेली कामगिरी नव्या पिढीला ही वास्तू पाहून कळणार आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी असलेल्या या भवनाचे नूतनीकरण केल्याबद्दल पुनीत व जान्हवी बालन आणि ट्रस्टचे सर्व विश्वस्त यांचे अभिनंदन. असेच चांगले सामाजिक काम त्यांच्याकडून होईल.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक यांच्यासह सर्वच क्रांतिकारकांनी या भवनातून चळवळ सुरू केली होती. जवळपास 140 वर्षे जुने असलेले हे भवन नूतनीकरण करण्याची गरज होती. त्यानुसार “इंद्राणी बालन फाउंडेशनने पुढाकार घेऊन “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’समवेत या भवनाचे नूतनीकरण केले, याचे समाधान आहे.
– पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त