हरारे – भारत व झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज येथे होत आहे. दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेला लोकेश राहुल या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मूळ संघ निवडीत त्याची तंदुरुस्ती सिद्ध झालेली नव्हती त्यामुळे शिखर धवनकडे कर्णधारपद दिले गेले होते.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे
वेळ : दुपारी 12ः45 पासून
ठिकाण : हरारे स्पोर्टस क्लब मैदान
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस नेटवर्क
या मालिकेत भारतीय संघाचेच पारडे जड राहणार असून नवोदित ऋतुराज गायकवाड, आवेश खान, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, शाहबाज अहमद व प्रसिद्ध कृष्णा यांना निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याची नामी संधी आहे. त्यातही ऋतुराज व सॅमसन यांना जास्त जबाबदारीने खेळावे लागणार आहे. आयपीएल स्पर्धेपूर्वी तसेच त्यानंतर झालेल्या मालिकांमध्ये त्यांना सातत्याने अपयश येत असल्याने आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत संघातील स्थान भक्कम करण्याची ही अखेरची संधी आहे.
भारतीय संघाची फलंदाजी व गोलंदाजी पाहिल्यास यजमान संघासमोर मोठे आव्हान राहणार आहे. फलंदाजीत त्यामनाने भक्कम खेळाडू आहेत. मात्र, गोलंदाजीत कृष्णा व आवेश यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. मोठ्या कालावधीनंतर संघात परतलेला अष्टपैलू दीपक चहर तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनाही संघातील स्थान पक्के करण्यासाठी या मालिकेत आपला ठसा उमटवावा लागेल.
दुसरीकडे यजमान झिम्बाब्वेचा संघही भरात आहे. त्यांनी रेकिस चकाब्वा या नवोदित खेळाडूकडे संघाची धुरा सोपवली आहे. त्यांच्या संघात सिकंदर रझा, इनोसेंट काइया यांच्या व्यतिरिक्त अन्य एकही अनुभवी खेळाडू नाही. तसेच या संघातील अनेक खेळाडू पहिल्यांदाच भारतीय संघाविरुद्ध खेळणार असल्याने त्यांच्या कामिगरीची अपेक्षा केली जात नसली तरीही ते आश्चर्याचा धक्का निश्चितच देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या संघाला कमी लेखणे भारतीय संघाला महागात पडू शकेल. त्यांनी मायदेशात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय तसेच टी-20 मालिकेत बांगलादेशचा पराभव केला होता त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही दुणावला आहे. त्यांच्या संघात तब्बल सात अष्टपैलू असल्याने ही मालिका रंगतदार ठरेल अशीच अपेक्षा आहे.
चहर निर्णायक ठरेल
भारतीय संघात मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत असलेल्या अष्टपैलू दीपक चहरकडे लक्ष राहणार आहे. यंदाच्या मोसमात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला विविध मालिकांसह आयपीएल स्पर्धेतूनही माघार घ्यावी लागली होती. आता मात्र, तो पूर्ण तंदुरुस्त ठरल्याने संघात परतला आहे. आता या मालिकेत त्याची कामगिरी सरस होते का नाही यावरच भारतीय संघाचेही यश अवलंबून राहणार आहे.