पुणे (गायत्री वाजपेयी)- तरुणांनो लष्करात भरती करून देण्यासाठी तुम्हाला जर कोणी लष्करी अधिकारी पैशांची मागणी करत असेल तर सावध व्हा! कारण, तुम्हाला आमिष दाखवणारी व्यक्ती कदाचित बनावट अधिकारी असेल आणि भरतीच्या नावावर तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे.
लष्कर भरतीच्या नावावर सुरू असलेल्या घोटाळ्यांसंदर्भात कठोर कारवाई केली जात आहे. त्याअनुषंगाने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या मिलिटरी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात तब्बल 50 हून अधिक “बनावट’ लष्करी अधिकाऱ्यांना पकडले असून, त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे, लष्करी गणवेश जप्त केला आहे. यापैकी काही व्यक्ती या लष्करात काही काळासाठी कार्यरत होते आणि सेवेतून बडतर्फ केल्यानंतर आर्थिक फसवणूक करत असल्याचे तपासातून समोर आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, “भारतीय सैन्य दल ही अशी संस्था आहे, जिथे नैतिकतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. याठिकाणी गुणवत्तेच्या आणि सक्षमतेच्या आधारावरच अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड होते. त्यामुळे तुमच्याकडे गुणवत्ता असेल, तर नकीच तुमची निवड होईल. मात्र लाचखोरीसारख्या भ्रष्ट मार्गाचा वापर करून सैन्यात येण्यासाठी कोणताही मार्ग नाही आणि तरुणांनी अशा मार्गाचा वापरही करू नये.’
तुम्ही काय कराल?
लष्करात विविध पदांवर भरती करण्यासाठी कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्या व्यक्तीच्या जाळ्यात न अडकता सर्वप्रथम संबंधित व्यक्तीचे ओळखपत्र तपसावे. त्यानंतर याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा वरिष्ठ लष्करी अधिकारी यांना माहिती द्यावी.
अलीकडील बोगस लष्कर भरतीच्या प्रकरणांमध्ये सेवारत लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे आढळले आहे. ही एक चिंतेची बाब असून, त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांच्या नैतिकतेबाबत आणि पर्यायाने सैन्यदलाच्या निवड प्रक्रियेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळेच शेकटकर समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशीनुसार क्लिनिकल सायकॉलॉजीच्या माध्यमातून सैन्याधिकाऱ्यांच्या नैतिकतेबाबत तपासणी झाली पाहिजे.
– डी. बी. शेकटकर,
लेफ्टनंट जनरल