पुणे – वारंवार सूचना देऊनही शहर स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग वाढण्याऐवजी नागरिकांकडून अस्वच्छताच केली जात असल्याचे चित्र शहरभर आहे. त्यामुळे नागरिकांना शिस्त लावण्यासाठी आता महापालिकेनेच कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून १६५ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकांना प्रत्येकी ५ जणांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.
शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना प्रत्येकाने दिवसाला कमीत कमी दोन हजार रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सोमवारी या सर्व निरीक्षकांची बैठक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी घेतली.
महापालिकेकडून शहरात दरवर्षी घनकचरा व्यवस्थापनासाठी तब्बल ७०० ते ७५० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचरा वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे असे प्रकार सतत घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी महापालिका शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन, तसेच नागरिकांमध्ये जागृती करत आहे.
पण, गेल्या दहा महिन्यांत अस्वच्छता करणार्या सुमारे २७ हजार नागरिकांकडून १ कोटी २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यानंतरही शहरात अस्वच्छतेचे प्रकार वाढतच आहेत. तर, नागरिकांना सूचना देऊन आणि नोटीस देऊनही वारंवार हे प्रकार घडतच असल्याचे महापालिकेने आता थेट कारवाईचा बडगा उभारला आहे. या आक्रमक भूमिकेचा किती फायदा होणार, हे लवकरच समोर येणार आहे.
– जनजागृती होत नसल्याने कारवाईचा बडगा
– शहर स्वच्छतेसाठी महापालिकेचा निर्णय
तब्बल हजार ठिकाणी उघड्यावर कचरा
नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकणे बंद करावे, यासाठी महापालिकेने कचरापेट्या काढून टाकल्या आहेत. सुरूवातीला या ठिकाणी कर्मचारी नियुक्त करत फिक्स स्पाॅट केले होते. त्यानंतर काही दिवस नागरिकांनी कचरा उघड्यावर टाकणे बंद केले. मात्र, त्यानंतर महापालिकेने फिक्स स्पाॅट बंद करताच पुन्हा कचरा उघडण्यावर टाकण्यास सुरूवात केली आहे. अशा ठिकाणांची संख्या हजाराच्या घरात गेली असून, या जागा महापालिकेची डोकेदुखी ठरू लागल्या आहेत.