पुणे – “टीईटी’ घोटाळ्यामुळे परीक्षा परिषदेतील बहुसंख्य विषय प्रलंबित राहिले आहेत. यावर सोमवारी राज्य समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहेत.
“टीईटी’ घोटाळ्याचा फटका परीक्षा परिषदेच्या सर्वच कामकाजाला बसला आहे. एनटीएस, एनएमएमएस, संगणक व मॅन्युअल टायपिंग, शिष्यवृत्ती या परीक्षा घेण्याचा निर्णयही रखडला आहे. मागील टायपिंग व “टीईटी’ परीक्षेचा निकालही लागलेला नाही.
शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रेही पडताळणीसाठी मागविण्यात आली आहेत. ती अक्षरश: धूळ खात पडलेली आहे. पोलिसांकडून यादी आल्यानंतरच ही प्रमाणपत्रे तपासण्याची भूमिका परिषदेने घेतली आहे. नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू करायची राहिलेली आहे.
परीक्षा परिषदेने प्रलंबित प्रश्नांबाबत मार्गदर्शक सूचना मागविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. मात्र, यावर काही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. यामुळे प्रश्न कायम राहिले आहेत. आता समितीपुढे सर्व विषय मांडण्यासाठी परिषदेने हालचाली सुरू ठेवल्या आहेत. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन परीक्षा घेण्याबाबत आग्रह अधिकाऱ्यांकडून धरण्यात येणार आहे.