पुणे – “वेतनवाढीसह एसटीचे विलीनीकरण राज्य शासनात व्हावे, अशी आमची मागणी आहे. फक्त पगारवाढ देत आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे जोपर्यंत विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत आम्ही संप कायम ठेवणार’, अशी भूमिका एसटीच्या संपातील सहभागी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
मागील 16 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यात शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) आणि पुणे स्टेशन या प्रमुख तीन स्थानकांसह पुणे विभागातील सर्वच आगारांमध्ये 8 नोव्हेंबरपासून संप कायम आहे. यामध्ये प्रशासकीय, कार्यशाळा या प्रवर्गासह चालक, वाहक सहभागी झाले आहेत, असे आंदोलकांनी माहिती देताना स्पष्ट केले आहे.
बुधवारी राज्याचे परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यासह विविध बाबींची घोषणा केली. त्यामुळे संप मिटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र परब यांच्या या घोषणेनंतर संपातील सहभागी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत आंदोलकांमध्ये वेतनाच्या मुद्द्यावर विविध चर्चा सुरू होत्या.
शिवनेरी, शिवशाही, खासगी बसेसद्वारे प्रवास
एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने सध्या खासगी बसेस आणि वाहनांतून प्रवासी वाहतूक सुरू आहे. तर शहरातील प्रमुख आगारांतून शिवनेरी आणि शिवशाही बसेस धावत असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे. बुधवारी शहरातील शिवाजी नगर (वाकडेवाडी) आगारातून नाशिक 16, औरंगाबादसाठी 8 बसेस सुटल्या. पुणे स्टेशन आगारातून दादरसाठी 20 बसेस रवाना झाल्या. तर स्वारगेट आगारातून दादरसाठी 13, ठाणेसाठी 21, सांगलीसाठी 10, मिरजसाठी 5, बारामतीसाठी 6, कल्याणसाठी 2, साताऱ्यासाठी 8 बसेससह पिंपरी-चिंचवड आगारातून तीन अशा एकूण 94 बसेसचे संचलन झाले. यामध्ये 58 शिवशाही आणि 36 शिवनेरी बसेसचा समावेश आहे. या बसेसमधून 2 हजार 154 जणांनी प्रवास केला, अशी माहिती वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर रणवरे यांनी दिली.
बुधवारी सरकारने केलेल्या घोषणेने कामगारांची दिशाभूल होत आहे. महामंडळाच्या सेवेतील वर्षांनुसार कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. सर्व कर्मचारी एकत्र असल्याने, या भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही. यामुळ कर्मचाऱ्यांचा मूळ विलिनीकरणाचा मुद्दा बाजूला पडला आहे. त्यामुळे विलिनीकरण झालेच पाहिजे या भूमिकेवर आम्ही असून, संप सुरू राहणार आहे.
– राजेंद्र मेश्राम, कर्मचारी
कर्मचाऱ्यांचा संप मोडण्यासाठी सरकारने निर्णय जाहीर केला आहे. पगारवाढीचा विचार करून अनेक कर्मचारी कामावर हजर होण्याचा विचार करतील. त्यामुळेच संप मिटण्यासाठीचा प्रयत्न आहे. पण कोणीही संप मोडणार नाही. संप मागे घेण्याबाबत न्यायालय जोपर्यंत आदेश देत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे.
– गजानन कच्छाव, कर्मचारी