पुणे (डॉ.राजू गुरव) – राज्य शिक्षण मंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करुन छापलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका आता रद्दीत देण्यात येणार आहेत. करोनामुळे परीक्षाच रद्द झाल्याने या प्रश्नपत्रिका रद्दीत विकण्याची वेळ आली आहे. यासाठी ई-लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रश्नपत्रिकांचे वजन सुमारे 850 टन आहे.
सन 2020-21 मध्ये करोनामुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंदच होती. फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन लांबणीवर पडले. दहावीच्या परीक्षा दि. 29 एप्रिल ते 20 मेदरम्यान होणार होत्या. यासाठी 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांची नोंदणीही झाली होती. तर, बारावीच्या परीक्षा दि.23 एप्रिल ते 21 मेदरम्यान होणार होत्या. यासाठी 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. राज्य मंडळाने परीक्षेची सर्व तयारी केली होती. करोनामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता याला प्राधान्य देत शिक्षण विभागाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करत अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल तयार करुन ते घोषितही केले. दरम्यान, सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळाच्या गोडाऊनमध्ये रद्द झालेल्या प्रश्नपत्रिका पडलेल्या आहेत. चालू वर्षातील प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी आधी गोडाऊन रिकामी करावी लागणार आहेत. त्यादृष्टीने राज्य मंडळाने ई-लिलाव पद्धत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गोपनीय साहित्यात पेपर रद्दीसह कोरेगेटेड बॉक्स, नायलॉन स्ट्रिप, प्लास्टिक व कागदी रॅपर, खाकी पाकिटे आदींची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.
अशा आहेत अटी
प्रतिकिलोला किमान दहा रुपयांपेक्षा
अधिक दराची अपेक्षा
साहित्य 25 दिवसांत उचलण्याचे बंधन
साहित्य मुदतीत न उचलल्यास प्रतिदिन
दहा हजार रुपये दंड. काम अर्धवट सोडल्यास अनामत रक्कम जप्त होणार
निविदा दर भरण्यासाठी ठेकेदारांच्या संगनमताने हालचाली
राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुणे बोर्डाच्या कार्यालयात नुकतीच ठेकेदारांची निविदापूर्व बैठक घेतली. यात सुमारे 15 ठेकेदार उपस्थित होते. यात ठेकेदारांनी आपले गाऱ्हाणे मांडले. “चेहरे पाहून, वशिलेबाजीने कोणालाही कामाचा ठेका मिळणार नाही. नियमानुसारच पात्र असणाऱ्या ठेकेदारालाच काम मिळेल,’ अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी सुनावले. दरम्यान, बैठक संपल्यानंतर आवारात ठेकेदार गटागटाने जमले होते. निविदांसाठी काय दर भरायला, “रिंग’ करुन निविदा भरायची, काम एकाला मिळाले तरी ते वाटून वाटून करायचे याबाबतची रणनिती आखण्यात ठेकेदार मग्न झाले असल्याचे आढळून आले.