नीलकंठ मोहिते
इंदापूर – लोकसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपलेली आहे.असे असतानाच बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात तसे पाहिले तर राजकीय चित्र यंदा वेगळे दिसते आहे. राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या विचाराचे आजी-माजी आमदार काम करत असल्याने, एका दिलाने इंदापूर तालुका चालेल अशी अपेक्षा जनतेला होती.
मात्र, आजी-माजी आमदारांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली असून विकासकामे करण्यावरून श्रेयवाद पेटला आहे. सत्ताधारी असूनही राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपमध्ये सारे काही अलबेल नाही हे मात्र नक्की! इंदापूर तालुका नेहमीच राजकीय पंढरी म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे.राज्याच्या राजकारणात जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ठसा उमटवतील असे काम करून, दाखवतात. मात्र राजकीय विळा भोपळ्याचे नाते असलेले भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच आमदार दत्तात्रय भरणे हे दोघेही कोठेही बोलण्याची संधी मिळताच एकमेकांवर राजकीय निशाणा साधत आहेत.
आमदार दत्तात्रय भरणे लोकप्रतिनिधी असल्याने जिल्हा नियोजन कमिटीवर ते पदसिद्ध कायमच आहेत. तर भाजपच्या माध्यमातून जिल्हा नियोजन कमिटीवर सदस्य म्हणून हर्षवर्धन पाटील काम पाहत असल्याने तालुक्यातील विकासकामांसाठी लागणार्या निधीच्या मागणीमध्ये दोघेही नेते कोठे कमी पडताना दिसत नाहीत. त्यामुळे दोघेही म्हणतात मी पाठपुरवा केल्याने हा निधी मंजूर झाला असल्याचा डंका पिटत आहेत.
इंदापूर शहरातील मालोजी राजे गढी संवर्धन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा करून आमदार दत्तात्रय भरणे यांनी गढीचा विषय मार्गी लावला आहे. तर या गढी संवर्धन करण्यासाठी अधिकची रक्कम लागते यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लावून धरलेली आहे.
जनतेचा निधी मग श्रेयवाद कशाला?
आजी आमदार असो माजी आमदार असो कामे कोणीही करा, निधी कोणीही आणा विकास तालुक्याचाच होणार आहे ना, आणि त्यातही जो विकास निधी येतो आहे तो जनतेच्या टॅक्समधूनच येतो ना मग आजी, माजी आमदारांपेक्षा जनतेचाच निधी असतो ना मग तुम्ही श्रेयवाद करण्यापेक्षा जनतेचाच निधीतून विकासकामे होत असल्याचे सांगितले तर त्या नेत्याचे वजन नक्की वाढेल हे मात्र नक्की!
सत्ताधारी एकत्र काम करणार का?
सरकारच्या बाजूने आमदार दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दोघेही राजकीय काम पाहत आहेत. मात्र तालुक्यात या दोघांचा राजकीय मिलाप होईल, असे चित्र मात्र आद्यापी जनतेने पाहिलेले दिसत नाही. एकमेकांवरील टीका थांबायला तयार नाही. त्यामुळे हे दोन्हीही नेते लोकसभेला एकत्र काम करणार का? हा मोठा प्रश्न जनतेच्या समोर निर्माण झाला आहे. तर अचानकच आमदार दत्तात्रय भरणे लोकसभा लढवणार आशा वावड्या उडवण्यात आल्या; मात्र चक्क आमदार भरणे यांनी लोकसभेचा आणि माझा काही संबंध नाही असे म्हणत लोकसभेच्या निवडणुकीबद्दल हात झटकले.
फोटो : आमदार दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील