पुणे – केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात लस पुरवठा झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात दररोज दीड लाख जणांचे लसीकरण करण्याने नियोजन झाले आहे. पण, अन्य जिल्ह्यांतही तेथील लोकसंख्या, उपलब्ध मनुष्यबळ पाहून लसीकरण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुरंदरमधील बहिरवाडी हे लसीकरण पूर्ण झालेले पहिले गाव आहे. लसीचा साठा पुरेशा प्रमाणात येत नसल्यामुळे लसीकरणाला गती मिळत नाही. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसह एड्सग्रस्त, अनाथ, आजारी व्यक्ती, यांना जागेवर जाऊन लस देण्यात येणार आहे. मोठ्या सोसायट्यांमध्येही लसीकरण करण्यासाठी दोन्ही महापालिकांनी नियोजन केले आहे. मात्र, लसींचा साठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत हे लसीकरण होऊ शकत नाही, असे पवार म्हणाले.
…त्या मंत्र्यांशी मी बोलेन
एकीकडे कडक निर्बंध लावत असताना, आघाडी सरकारच्या एका मंत्र्याने ओबीसी समाजाचे शिबिर आयोजित केले आहे. त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, “राज्य सरकारकडून परिस्थितीनुसार एवढ्या लोकांना परवानगी असे स्पष्ट केले जाते. त्यानुसार नियमांचे काटेकोर पालन करावे. तुम्ही ज्या सहकाऱ्याचे नाव घेतले, त्यांनाही याबाबत बोलेन.’ तर, “आगामी निवडणुकांमध्ये कोणाची युती किंवा आघाडी होईल, हे त्यावेळी नक्की सांगेन,’ असेही पवार यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी घाई करू नये
परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे सध्या लसीकरण सुरू आहे. मात्र, कोविशील्ड लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच परदेशांत जाण्यास जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली आहे. तर कोवॅक्सिनला ती परवानगी नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था असून, कोवॅक्सिन घेतलेले विद्यार्थी “आम्ही कोविशील्ड लस घेऊ का? असा प्रश्न विचारत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी तसे करू नये असा सल्ल टास्क फोर्सने दिला आहे. कोवॅक्सिनला लवकरच परवानगी मिळेल, असे संबंधित कंपनीकडून सांगण्यात आले असून त्याबाबत चर्चा सुरू आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.