पुणे – राज्यातील ज्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत व काही ठिकाण शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचे समायोजन महिन्याभरात केले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.
विद्यार्थी संख्येनुसार शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांची संख्या संच मान्यतेद्वारे स्पष्ट होत असते. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या विचार करता शिक्षकांची संख्या जास्त आहे. तर, काही ठिकाणी शिक्षकांची गरज भासू लागली आहे. राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ही अवस्था आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. त्यावर केवळ आश्वासनेही मिळालेली आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी पंचायत समितीअंतर्गत शिक्षकांच्या नियमबाह्य समायोजनाबाबत विधानसभा सदस्य संजीव रेड्डी बोदरकुवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी 2017 च्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यात येतो. तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे तिथे शिक्षकांची आवश्यकता असल्याने स्थानिक प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षक पाठविण्याचा निर्णय घेतला जातो. तसेच काही सदस्यांच्या याबद्दल तक्रारी असतील तर त्या तपासून घेऊन समायोजन करताना कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे.