पुणे- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व निकोप, समतामुलक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी लागणार आहे. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला दक्षता समिती स्थापन होणार आहे. शिक्षण आयुक्तालयाने याबाबतचे आदेश राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना बजाविले आहेत.
विद्याथ्यांचे हक्क व सुरक्षितता महत्त्वाचे आहे. काही समाज विघातक घटकांपासून कोणतीही आक्षेपार्ह घटना घडू नये व विद्यार्थी, विद्यार्थिनींचे मनोर्धेर्य खचू नये यासाठी विभागीय स्तरावर सूचनांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. जिल्हास्तरावर शिक्षनाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला दक्षता समिती स्थापन होणार आहे. यात “डायट’चे केंद्र संपर्क अधिकारी सदस्य सचिव असणार आहेत.
वर्ग 2 व वर्ग 3 मधील महिला अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित महिला डॉक्टर, महिला वकील, निवृत्त महिला मुख्याध्यापक, माजी विद्यार्थिनी आदींचा सदस्य म्हणून समावेश असणार आहे. समितीने महिन्यातून एकदा शाळांना अचानक भेटी देवून अडीअडचणी जाणून घेणे बंधनकारक आहे, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी आदेशात नमूद केले आहे. शाळेतील प्रत्येक इयत्तेला एक विद्यार्थिनी सखी व विद्यार्थ्यांसाठी एक विद्यार्थी नेमण्यात यावा. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दर पाच वर्षांनी चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे. पडताळणी अहवाल प्रतिकूल नसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना वेळीच योग्य शिक्षा देण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत.
शाळांसाठी सूचना
*प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असावी
*तक्रार करण्यासाठी व्हॉट्सऍप, हेल्पलाइन नंबर उपलब्ध करा
*शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्यांची वेळेसह रजीस्टमध्ये नोंद ठेवा
*विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तीस भेटू देवू नये
*विमा सुरक्षा योजनांची अंमलबजावणी करा
*सीसीटीव्ही बसवावेत
*विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत
*शाळेचा परिसर बंदिस्त ठेवा
*गरजेनुरुप सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवावी