थेट जलसंपदा मंत्र्यांचा “वॉच’
पुणे – कालव्यातून पाणी चोरी होत असल्याने शेवटपर्यंत पाणी पोहोचत नाही. अशा पाणी चोरी करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे आता खुद्द जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रश्नी लक्ष घातले आहे. पाण्याची चोरी करणाऱ्यांना योग्य प्रायश्चित झाले पाहिजे. त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशा स्पष्ट शब्दांत पाटील यांनी पाटबंधारे विभागाला आदेश दिले आहेत.
कालव्यातील पाणी चोरी हे नेहमीच चर्चीला जाणारा मुद्दा आहे. या पाणी चोरांविरुध्द कारवाई होत नाही. त्यामुळे बिनधाक्तपणे कालव्यातून पाण्याची चोरी होत राहते. कालव्यातून थेट विहिरीत पाणी सोडणे, कालव्याला भगदाड पाडून पाणी
वळविणे अथवा कालव्यात पाण्याचा पंप टाकून पाणी उपसणे, या प्रकारांमुळे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही, त्यामुळे त्या भागातील शेती पाण्यापासून वंचित राहते.
जे प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरतात त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होते, यासर्व पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने या लोकांविरुध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.