मनोज खंडागळे
नाथाचीवाडी -करोनाची तिसरी लाट आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आदी कारणांमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या, परंतु आता गट व गणाच्या पुनर्रचनेसाठी शासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. केडगाव गटातील नाथाचीवाडी हे गाव कोणत्या गटाला जोडणार, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भौगोलिकदृष्ट्या नाथाचीवाडी हे गाव यवतपासून 7 किमी अंतरावर आहे. केडगाव-पारगाव गट हे नाथाचीवाडीपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. यवत गट हे नाथाचीवाडीपासून जवळचे आहे, हे गाव केडगाव-पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये होते. पारगाव गणामध्ये आहे.. या गणांत नाथाचीवाडी, पारगाव, लाडकतवाडी, एकेरेवाडी, गलांडवाडी ही गावे येतात. या गावात आमदार राहुल कुल- माजी आमदार रमेश थोरात यांचे गट प्रबळ असून दोन्ही गटांचे कमी जास्त प्रमाणात वजन आहे.
मागील काळात झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून थोरात गटाच्या सयाजी ताकवणे यांना उमेदवारी तर भाजपाकडून कुल गटाच्या ज्ञानदेव ताकवणे यांना उमेदवारी मिळाली होती. जिल्हा परिषदेसाठी राष्टवादीकडून थोरात गटाच्या राणी शेळके यांना उमेदवारी मिळाली होती. भाजपाकडून कुल गटाकडून राजश्री शेळके यांना उमेदवारी दिली होती.
यामध्ये पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या थोरात गटाचे सयाजी ताकवणे यांचा काही मतांनी विजय झाला. राष्ट्रवादीच्या थोरात गटाचे उमेदवार राणी शेळके यांचा जवळपास 1800 मतांनी विजय झाला होता. यात कुल गटाला धक्का बसला होता. नाथाचीवाडी गावातून चांगले मताधिक्य राष्ट्रवादीच्या थोरात गटास मिळाले होते.
नाथाचीवाडीची मतदारसंख्या जवळपास 3200 शेच्या आसपास आहे. त्यामुळे हे गाव कोणत्या क्षणी निर्णायक ठरू शकतो.गावातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत ही कुल गटाकडे असून थोरात गटाचे चार उमेदवार सदस्य म्हणून ग्रामपंचायतमध्ये आहेत. विविध विकास संस्थेवर देखील कुल गटाची एकहाती सत्ता आहे.
आत्ता प्रशासकीय हालचालीमुळे नवीन गट आणि गणामुळे नाथाचीवाडी ही पूर्वीच्या केडगाव पारगाव गटालाच जोडून असेल का, नव्याने यवत गटाला जोडली जाईल, यावर मात्र आता कार्यकर्ते आणि नेतेमंडळी यांच्यात चर्चा रंगली आहे. काहीजण मुरब्बी कार्यकर्ते तर नाथाचीवाडी ही यवत गटाला जोडली जावी, असे मत मांडत आहेत.