पुणे, दि. 19 – पादचारी मृत्यूचा आकडा मागील काही वर्षांपासून सतत वाढत असून यावर्षी 96 जणांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. “सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’ संस्थेने माहिती अधिकारात ही माहिती मिळवली असून, ती धक्कादायक आहे. यातील सर्वाधिक मृत्यू हे रस्ता ओलांडताना झाले आहेत.
शहरात पादचाऱ्यांच्या मृत्यूचा आकडा प्रत्येक वर्षी वाढत असताना शहरातील विविध चौकांत फक्त 15 टक्के पादचारी सिग्नलचे दिवे सुरू असल्याचे आढळून आले आहे. या बाबतीत महापालिका व वाहतूक पोलीस गंभीर नाहीत, असा आरोप केला जात आहे. पादचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून त्यात सुधारणा व्हाव्यात, यासाठी पुणे मनपा दि.11 डिसेंबर हा पादचारी दिन साजरा करणार आहे. पण, तो फोटोसेशन आणि कागदपत्रांपुरताच असल्याचे आकडेवारीवरून समोर येते आहे.
रस्ता ओलांडण्याची सर्वांत सुरक्षित जागा म्हणजे सिग्नल असलेले चौक असतात. परंतु, मनपा आणि वाहतूक पोलीस या दोघांकडून तेथील पादचारी सिग्नल्सबाबत सापत्न वागणूक मिळताना दिसते. वाहतूक पोलिसांकडून पादचारी सिग्नल बिघडल्याच्या तक्रारी अभावानेच केल्या जातात. तर, दुसरीकडे, मनपाचे कंत्राटदार वाहनांचे सिग्नल दुरुस्त करायला जातात, त्यावेळी बिघडलेले सिग्नल स्वत:हून दुरुस्त करायची काळजी घेत नाहीत. याचा परिणाम म्हणून जेमतेम 15 टक्के पादचारी सिग्नल कार्यरत अवस्थेत असल्याचे “एसपीटीए’चे हर्षद अभ्यंकर यांनी सांगितले.
वर्ष आणि पादचारी मृत्यू
2016 – 87
2017 – 64
2019 – 64
2020 – 34
2021 – 84
2022 – 96