पुणे- प्रारूप प्रभाग रचनेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी 2 हजार 081 पैकी 420 च हरकतींची सुनावणी घेण्यात आली. एकूणच ज्या हरकती-सूचना आल्या होत्या, त्यातील 21.5 टक्केच हरकतीच प्रत्यक्षात मांडल्या गेल्या, त्यामुळे सुमारे 78.5 टक्के हरकती मांडण्यासाठी तक्रारदार आलेच नाहीत. प्रभाग रचनेवर एकूण 3 हजार 596 हरकती-सूचना आल्या होत्या. त्यापैकी दोन दिवसांत 773 तक्रारदार उपस्थित राहिले. यात पहिल्या दिवशी 353 तर दुसऱ्या दिवशी 420 हरकतींवर सुनावणी झाली.
महापालिकेच्या निवडणूक प्रभाग रचनेच्या हरकती-सूचनांवर बालगंधर्व रंगमंदिरात गुरूवार आणि शुक्रवारी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवाडे, अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव दीपक नलावडे, अप्पर सचिव अतुल जाधव, महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख अजित देशमुख उपस्थित होते.
सुनावणीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी 1 ते 20 आणि 27 ते 31 तसेच 33 आणि 35 नंबरच्या प्रभागांवर आलेल्या 1515 हरकती आणि सूचनांवर सुनावणीसाठी ठेवल्या होत्या. मात्र, 353 तक्रारदारांनीच हजेरी लावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 21 ते 26 आणि 36 ते 58 प्रभागातील 2081 हरकती-सूचनांवर सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यात केवळ 420 तक्रारदारांनीच हजेरी लावली. सुनावणीच्या दोन दिवसामध्ये 3596 तक्रारदारांपैकील 21.5 टक्के म्हणजे 773 तक्रारदारांनीच हजेरी लावली.
सर्वाधिक तक्रारी 41, 42, 43 प्रभागातून सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या प्रभाग रचनेवरील सुनावणीत 41, 42, 43 या तीन प्रभागातील हरकती-सूचना जास्त होत्या. हडपसर, रामटेकडी हा भाग या प्रभागात येतो.