मागणी घटल्याचा परिणाम; मोठा साठा उपलब्ध
तूर, हरभरा, उडीद डाळींच्या भावात घट
पुणे – डाळींना घटलेली मागणी, व्यापाऱ्यांकडे उपलब्ध अधिक साठा या समीकरणामुळे मार्केट यार्डातील भुसार बाजारात तूर, हरभरा तसेच उडीद डाळींच्या भावात क्विंटलमागे 100 ते 1 हजार रुपयांनी घट झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा डाळींच्या भावात चढ-उतार होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
बाजारात डाळींची आवक सुरू आहे. मात्र, जावक फारशी नाही. त्यामुळे डाळींचा व्यापार थंडावला आहे. परिणामी तूरडाळीच्या भावात 100 ते 300 रुपयांची घसरण झाली. मसूर आणि हरभरा डाळींच्या भावात 100 ते 200 रुपयांची घट झाली आहे. तसेच, उडीद डाळीच्या भावात सर्वाधिक 1 हजार रुपयांची क्विंटलमागे घट झाली आहे,’ अशी माहिती व्यापारी नितीन नहार यांनी दिली.
डाळींचे व्यापारी विजय राठोड म्हणाले, येथील बाजारात विदर्भ तसेच मध्य प्रदेशातून तुरडाळ, विदर्भासह लातूरमधून हरभरा डाळीची आवक होत असते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातून उडीद डाळीची तर, मसूरडाळ अर्जेंटिना, ऑस्ट्रेलियामधून आयात केली जाते. राजस्थानातून मूग, मध्य प्रदेशातून उडीद डाळीची आवक होते.
सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे डाळींच्या पिकांची स्थिती नेमकी काय आहे हे कळेल. मार्केटयार्डात उडीद डाळीची दररोज 1 हजार पोतींची तर, तूरडाळीसह हरभरा डाळीची प्रत्येकी सुमारे दीडशे टनाची आवक होत आहे.’ नाफेडकडे सरकारने खरेदी केलेल्या डाळींचा मुबलक साठा उपलब्ध आहे. हा साठा बाहेर काढल्याशिवाय भाव स्थिर होणार नाहीत.