इस्लामपूर येथील कोंबडीपालक संघर्ष समितीचा निर्णय
इस्लामपूर – कडकनाथ घोटाळ्यासंबंधी न्याय मिळावा यासाठी बेळगांव ते मुंबईपर्यंत दुचाकी रॅलीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय कडकनाथ कोंबडीपालक संघर्ष समितीच्या राज्यव्यापी शेतकरी मेळाव्यात घेण्यात आला. दरम्यान, इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचेही ठरविण्यात आले आहे.
कडकनाथ घोटाळ्यासंबंधी न्याय मिळवण्यासाठी सरकार स्थापनेनंतर हा मोर्चा असेल. यासंदर्भात 25 नोव्हेंबर पासून तालुकावार नियोजन बैठका सुरु करण्याचे ठरले आहे. कडकनाथ कोंबडीपालक संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड दिग्विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला.
दिग्विजय पाटील म्हणाले, 22 ऑगस्टला कडकनाथ घोटाळ्यासंबंधीची पाहिली पत्रकार परिषद सांगली येथे झाल्यापासून ते आजअखेर कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्यात अडकलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांचा लढा सुरु आहे. मात्र शासन व प्रशासनाने या लढ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता लढा व्यापक करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मुंबई मंत्रालयावर कडकनाथ कोंबडीपालकांचा धडक मोर्चा काढण्यात येईल.
ऑगस्ट महिन्यात इस्लामपूर पोलीस ठाण्यावर झालेल्या मोर्चानंतर आजवर पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे, तपास चालू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी संबंधित लोकांवर गुन्हे नोंद झालेत. पुढे काय झाले? याचा तपशील सार्वजनिक करा, एमपीआयडी कायदा कलम 3 प्रमाणे कारवाई करा, अधिकारी नेमा ही मोर्चाची प्रमुख मागणी असेल. कारण ते कलम या गुन्ह्यात लागले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या मान्य केल्याचे सांगितले आहे. त्यावर कारवाई सुरु आहे.
ती फाईल कुठे अडकली याचा तपास झाला पाहिजे. मागण्यांसाठी मोर्चा असेल. या विविध विषयांवर चर्चा झाली. कोंबड्यांच्या खाद्यासाठी लागणाऱ्या मक्याच्या संदर्भात वेगवेगळा पत्रव्यवहार सुरु आहे. शेतकऱ्यांची सहकारी कोंबडी पालक संस्था सुरु करण्यासाठीची तयारी करणे, सभासदत्वाचे फॉर्म लवकरच सर्व तालुक्यात उपलब्ध करणे, ग्राहक न्यायालय, नोटीस तसेच हाय कोर्टात तपास जलदगतीने होण्यासाठी याचिका दाखल करण्यासंबंधी निर्णय घेणे, पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी या घोटाळ्यात अडकलेला प्रत्येक शेतकरी आपल्याशी जोडला जाणे आवश्यक आहे, यासाठी संगठीत प्रयत्न करणे, तालुका पातळीवर चळवळीतील अनुभवी कार्यकर्ते व शेतकरी यांचा समन्वय करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवणे.
संघटना रचनेबाबत व पुढील लढ्याच्या दिशा निश्चितीबाबत आजवर जे निर्णय झालेत त्यांची अंमलबजावणी करणे, शेतकरी संगठीत होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, संघटना सभासदत्वाचा फॉर्म सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, गाव, तालुका, जिल्हा समन्वयक तसेच स्थानिक निर्णय घेण्यासाठी कमिट्या तयार करणे याबाबत यावेळी चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यातून शेतकऱ्यांनी नावे द्यावीत. कमिटीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने लढणाऱ्या सर्व संघटना प्रतिनिधी असाव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
मेळाव्यास महेश जाधव, संजय निकम, राहुल सपकाळ, शीतल पवार, सचिन माळी, अंकुश काळे, सचिन डुबल, उत्तम पाटील, इसाक नदाफ यांचेसह राज्यातील नाशिक, धुळे, चिकोडी, बेळगांव, गडहिंग्लज, इंदापूर, पुणे, सातारा, सोलापूरसह सांगली जिल्ह्यातील शेतकरी या मेळाव्यास उपस्थित होते.