जांबूत -शिरूरच्या बेट भागातील काठापूर खुर्द, पिंपरखेड, चांडोह आदी गावांमध्ये बिबट्याने थैमान घातल्याने चार जणांचे बळी गेले तर कित्येक जण गंभीर जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीती शेतकऱ्यांना दिवसादेखील शेतात काम करताना बिबट्याचे दर्शन होत असल्याने दिवसा वीज मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
सद्यःस्थितीत पिंपरखेड येथील वीज उपकेंद्रावरून शेतकऱ्यांना दिवसा कृषीपंपासाठी सकाळी 10:20 ते सायंकाळी 6:20 वा. तर रात्रीच्या वेळी रात्री 9:35 ते सकाळी 5.35 या वेळेत विद्युत पुरवठा होत असल्याने रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. महिलांना रात्रीच्या वेळापत्रकानुसार वीज असताना पिण्याचे पाण्यासह जनावरांचे पाणी भरण्यासाठी बिबट्याच्या भीतीमुळे अवघड झालेले आहे. म्हणून घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता महावितरण विभागाने रात्रीच्या विजेच्या नियमांत बदल करून पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली नाही तर आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी सभापती देवदत्त निकम यांनी दिला आहे. या आधीही दिवसा विजेसाठी महावितरणला वनविभागाने प्रस्ताव सदर केला आहे; मात्र कुटुंबातील सदस्यावर असा जीवघेणा प्रसंग ओढवला तर प्रशासनाकडून त्या कुटुंबियांना मदत दिली जात असली तरी अशा घटनेमुळे एखादे कुटुंब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.
केवळ सांत्वन नको; ठोस उपाययोजना करा
वाढत्या बिबट संख्येला आळा घालण्यासाठी हा विषय शासनदरबारी मांडणे गरजेचे आहे. या भागात असणाऱ्या बिबट्यांची संख्या लक्षात घेता वाईल्ड लाईफ च्या माध्यमातून ड्रोन कॅमेरे बसवून या बिबट्यांवर नजर ठेऊन त्यांना बंदिस्त करणे तसेच होणारे हल्ले कायमस्वरूपी कसे रोखता येतील, यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या काळात माणसांवरील जीवघेण्या हल्ल्यांची संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. घटनेवेळी केवळ लोकप्रतिनिधी येऊन संबंधित कुटुंबीयांचे सांत्वन करून निघून जातात.
बिबट्यांना जेरबंद करा
याबाबत पिंपरखेड आणि परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पिंपरखेड -वडनेर खुर्द रस्त्यावरून अनेक नागरिक, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. बोंबेमळा येथे कालवा चारीचे कठड्यावर आणि सरांडी ओढ्यात दररोज नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत आहेत. तरी या परिसरात अजून दोन पिंजरे लावण्यात येऊन सदर बिबटे तातडीने जेरबंद करून स्थानिकांना भयमुक्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य बळवंत बोंबे, संचालक नरेंद्र बोंबे यांनी केली आहे.