आंबेगाव बुद्रुक (संतोष कचरे) – दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार व शिवकालीन वारसा असलेले आंबेगाव खुर्द हे गाव निसर्गाच्या सान्निध्यात वसले असून गावठाण, शनिनगर, हनुमाननगर, सच्चाईमाता परिसर, खंडोबा मंदिर, स्वामीनारायण मंदिर परिसर मिळून साधारण 25 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले शेती हे मुख्य व्यवसाय असलेल्या या गावाचा समावेश पाच वर्षांपूर्वी महापालिकेत झाला. त्यानंतर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती; परंतु गेल्या पाच वर्षात काडीचाही फरक या परिसरात झाला नसल्याने गावाचे गावपण जसेच्या तसे आहे.
महापालिकेत गाव समावेश झाल्याचा आनंद ग्रामस्थांना जास्त काळ घेता आलेला नाही. पालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर स्मार्ट सिटी होईल. गुळगुळीत रस्ते, मर्क्युरी लाइट, 24 तास पाणीपुरवठा माफक अपेक्षा असताना यातील एकही पूर्ण झाली नाही. आजही गावात पाणी, रस्ते, ड्रेनेजलाइन या समस्या कायम आहेत.
2008 मध्ये शासनाच्या महाजल योजनेतून झालेल्या पाण्याच्या टाकी व पाइपलाइनद्वारेच आजही गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. बोअरवेल व टॅंकरने पाण्याची गरज भागविली जाते आहे. पालिका गावाचा समावेश झाल्यानंतर या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. मोठमोठ्या सोसायट्या उभ्या राहिल्या; परंतु त्या प्रमाणात विकासकामे झाली नाहीत. याउलट महापालिकेने कर वाढविला आहे तसेच पाणीपट्टी ही वसूल केली जात आहे.
तलावांकडे पालिकेचे दुर्लक्ष…
आंबेगाव परिसरासाठी महत्त्वाचा व अभिमानास्पद असणारा आंबेगाव खुर्द व जांभुळवाडी पाझर तलावाची निर्मिती 1972 दुष्काळात करण्यात आली. पावसाळ्यात या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत असतो. त्यामुळे तलावाचे पाण्याचे शुद्धीकरण करून या गावांना पाणीपुरवठा केला तर गावांचा पाणीप्रश्न सहज सुुटू शकतो. सदर तलावाचा विकास केला तर या भागात पर्यटनस्थळातून रोजगाराच्या संधीही उपलबध होऊ शकतात. यातून महापालिकेचा महसूलही वाढू शकेल. मात्र, या महत्त्वाच्या प्रकल्पाकडेच पालिकेचे दुर्लक्ष आहे.