पुणे -राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या निवड यादीतील चुकांची दुरुस्ती करून सुधारित निवड यादी प्रसिद्ध करावी, या मागणीसाठी उमेदवारांनी शिक्षण आयुक्तांकडे हट्ट धरला आहे. अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व काही खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी मुलाखतीशिवायची थेट निवड यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात माजी सैनिक, महिला, खेळाडू, भूंकपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग व इतर समांतर आरक्षणाची पदे रिक्तच राहिली आहेत. या विविध वर्गांमधील उमेदवार उपलब्ध असताना त्यांच्याऐवजी इतरांना निवड यादीत स्थान मिळाले आहे. काही उमेदवारांनी जवळच्या शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविलेला असतानाही त्यांना दूरच्या ठिकाणच्या शाळा मिळाल्या आहेत. अशा विविध स्वरुपातील गाऱ्हाणे उमेदवारांकडून मांडण्यात येऊ लागले आहे.