फलटण – आरडगावला भीषण पाणी टंचाईची स्थिती असल्याचे वृत्त वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होताच, प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी ताबडतोब आरडगावला भेट दिली. तसेच तेथील पाणी प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, सर्कल राहुल खाडे यांनी तत्पर भेट देऊन समस्त ग्रामस्थांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या हॉलमध्ये बैठक घेतली. यावेळी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. श्री. ढोले यांनी गावची लोकसंख्या व जनावरांची संख्या याविषयी माहिती घेतली. गावची लोकसंख्या 1200 व जनावरांची संख्या 1300 असल्याचे लक्षात घेता, 80 हजार लिटर पाणी देणे शक्य आहे. सध्या दोन दिवसात तीन टॅंकरद्वारे अंदाजे 72 हजार लिटर पाणी दिले जात आहे. त्यात वाढ करून, उर्वरीत आठ हजार लिटर पाणी वाढवून देऊ, अशी ग्वाही श्री. ढोले यांनी दिली. धोम- बलकवडी कॅनॉलचे पाणी कसे सोडता येईल, याविषयी त्यांनी धरण व्यवस्थापनाशी मोबाईलद्वारे चर्चा केली.
परंतु धरणातच पाणी कमी असल्याने, ते तांबवे धरणात सोडण्याबाबत खात्रीने सांगता येणार नाही, असेही श्री. ढोले यांनी स्पष्ट केले. सुरेश भोईटे यांनी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना गावासाठी मंजूर आहे. त्यासाठी तांबवे धरणातून विहीर खोदून पाईपलाईनद्वारे पाणी आणायचे आहे. मात्र आरडगावच्या लगत वनविभागाची जमीन असल्याने पाईपलाईनसाठी चर खोदण्यास मान्यता नसल्याने या कामास ब्रेक लागला असल्याचे समजल्यावर श्री. ढोले यांनी संबंधित वनअधिकाऱ्यांशीही संपर्क साधला. तसेच त्याबाबतच्या अडचणी सोडवण्याच्या आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
दरम्यान, जनावरांमध्ये लम्पी आजार वाढला असून त्याविषयी काळजी घेणे व आवश्यक ते लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही श्री. ढोले यांनी केले. ज्यांच्या विहिरीला पाणी आहे अशा लोकांनी जनावरांचा चारा आपल्या शेतात जास्तीत जास्त पिकवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, शैलेश भोईटे, माजी सरपंच, सुभेदार भोईटे, भीमराव भोईटे यांनीही आपली मते मांडली. लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामस्थांसमवेत विहिरीची पाहणी केली. त्या पाण्याची तपासणी करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले. यावेळी सरपंच रविंद्र शिर्के, उपसरंपच अरुणा भोईटे, पोलीस पाटील अमित भोईटे, चंद्रकांत भोईटे, ग्रामविकास अधिकारी कर्णे व गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रांताधिकाऱ्यांची ताकीद
यावेळी शैलेश भोईटे यांनी ग्रामसेवक कर्णे यांच्या कामाविषयी तक्रारी असल्याचे सांगून, चालू ग्रामसभेतून निघून जाणारा, लोकांच्या समस्या न जाणून घेणारा असा अधिकारी म्हणजे असून नसल्यासारखे आहेत असे समजल्यावर श्री. ढोले यांनी त्यास सक्त ताकीद देण्याच्या सुचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.