पुसेगाव (प्रतिनिधी) – नेर धरण आणि परिसरामध्ये पाण्याची पातळी खालावली आहे. भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या भागातील नागरिकांच्या व पशुधनाच्या स्थलांतराची वेळ येऊ नये,
यासाठी उरमोडी धरणातून आरक्षित अर्धा टीएमएमसी पाण्याचे आवर्तन नेर तलावात सोडून पाणी संकट दूर करावे, अशा मागणीच्या ग्रामपंचायतींच्या ठरावाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास बुध मंडलातील शेतकऱ्यांनी दिले.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, उत्तर खटावमधील बहुतांश गावांच्या पाणीपुरवठा योजना नेर तलावावर अवलंबून आहेत, तसेच या भागात पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चारा-पाण्याची देखील टंचाई झाली आहे, तरी शासनाने पाणी संकटाची दखल घेऊन शेतकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी उरमोडी धरणातून नेर तलावात लवकरात-लवकर पाण्याचे आवर्तन सुरू करावे.
दरम्यान, नेर, नागनाथवाडी, वर्धनगड, शिंपीमळा, ललगुण, फडतरवाडी, वेटणे, बुध, डिस्कळ, पांगरखेल, राजापूर, रणसिंगवाडी, नवलेवाडी, शिंदेवाडी या ग्रामपंचायतीचे ठराव निवेदनासोबत जोडले आहेत.