जेजुरी, (वार्ताहर)- जेजुरी शहरामध्ये प्रचंड दुष्काळामुळे उदभवलेल्या तीव्र पाणीबाणीचा सामना करण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी गावकऱ्यांसाठी टँकरने पाणी पुरवठा करीत आहे. उन्हाळी पिकांना पाणी न देता गावकऱ्यांना पाणी देत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने जलदूतच धावून आले आहेत.
चार दिवसांनंतर खंडेरायाचा सोमवती यात्रा उत्सव आहे. त्यावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीतून शक्य होईल. तसे पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे ठरवले आहे. यासाठी नगरपालिका प्रशासन व्यवस्थेने आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पाण्याचे टँकर नगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करून घ्यावेत. आमच्या विहिरीवरून भरावेत व शहरवासीयांना पुरवावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. जेजुरीतील सर्वच प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा वीर धरणाच्या मांडकी डोहातून सुरू आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन नादुरुस्त झाली आहे.
ती कार्यान्वित करण्याचे काम द्रुतगतीने सुरू आहे. मात्र, पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या तहानलेल्यांचा संयमाचा बांध फुटला. त्यांनी सोमवारी (दि.१) नगरपालिका कार्यालयात धाव घेत मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांना आंदोलन करणार असल्याचे तसेच पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दिला. मात्र, दरम्यान, खंडेरायाचे मंदिर गडकोट आवाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीकडेही पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले,
माणुसकीचा झरा रिता
संतोष खोमणे पाटील हे आठ दिवसांपासून लक्ष्मीनगर आदी भागात टँकरद्वारे मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत आहेत. पुढील आठवड्यात सोमवती अमावस्या असल्याने मागणी होईल तसे टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येणार आहेत.
प्रगतिशील शेतकरी व उद्योजक तारिक पानसरे यांनी आपल्या शेतातील उन्हाळी पिके सोडून देत विहिरीतील पाणी शहरवासीयांची तहान भागविण्याकरिता उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. प्रकाश भापकर यांनीही विहिरीतून चार टँकर मोफत भरून देणार असल्याचे जाहीर केले.