नगर -शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्यातील हमाल माथाडी कामगारांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा सुरक्षा कवच योजना लागू करावी, अशी मागणी जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, करोना साथीमध्ये काम करणाऱ्या देशभरातील शासकीय कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण योजना भारत सरकारच्या स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालयाने दि.3 एप्रिल 2020 रोजीच्या पत्रकान्वये लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानेही 11 एप्रिल 2020 रोजी राज्य सरकारच्या अखत्यारीत करोना साथीत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयाचे विमा सुरक्षा कवच लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सदरचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना लागू झाले असून अहमदनगर, पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांनी तर अधिकृतपणे ही विमा सुरक्षा कवच योजना तेथील कर्मचाऱ्यांकरिता लागू केली आहे.
ही योजना करोना साथीचा प्रतिबंध व उपचार इतक्यापुरतीच मर्यादित नसून करोना साथीच्या काळात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही लागू आहे. सद्यस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कंत्राटी अथवा मानधन तत्त्वावर नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनाही योजनेचे लाभ लागू झाले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणे, वाहतूक करणे कामी राज्यभर हमाल-माथाडी कामगार काम करीत आहेत. राज्यातील मार्केट यार्ड, किराणा ट्रान्सपोर्ट, रेल्वे मालधक्के, वेअर हाऊस येथे मोठ्या प्रमाणात मालाची आवक-जावक होत आहे. त्याच प्रमाणे व्यवहार होत असल्याने नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा चालू असते. परिणामी हमाल-माथाडी कामगारांना सामाजिक अंतर पाळणे शक्य होत नाही. तसेच संबंधित व्यापाऱ्यांकडून या कामगारांना कोणतीही संरक्षक साधने देण्यात येत नाहीत. परिणामी अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या हमाल-माथाडी कामगारांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.