पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिखली येथील म्हेत्रेवाडी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 92 मध्ये सध्या आठवीपर्यंत शिक्षण मिळत आहे. परंतु येथील बहुतांश विद्यार्थ्यांना नववी व दहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत आहे.
त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळेत नववी व दहावीचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांनी केली आहे.
यश साने यांनी याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाचे विजयकुमार थोरात यांना निवेदन दिले आहे. या निवदेनात म्हटले आहे की, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 92 शाळा ही चार मजली आहे. त्यामध्ये एकूण 15 वर्गखोल्या आहेत. त्यापैकी केवळ 11 वर्गखोल्या सध्या वापरात आहेत.
ज्यामध्ये सकाळी 6 वी ते 8 वी चे वर्ग भरतात. तर दुपार सत्रात 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग भरतात. त्यामुळे नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी येथे वर्गखोल्या उपलब्ध आहेत. तर महापालिकेने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दहावीपर्यंत वर्ग सुरू करावेत.
शाळेत सध्या शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या ही किमान 800 च्या घरात आहे. प्रत्येक वर्षी 8 वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थ्यांची संख्या ही किमान 92 ते 95 आहे. या विद्यार्थ्यांना नववीत प्रवेश घेण्यासाठी आजूबाजूच्या खासगी शाळेत हेलपाटे मारावे लागत आहेत. परंतु त्या ठिकाणी पटसंख्या पूर्ण असेल तर प्रवेश मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातील विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे तो शिक्षणापासून वंचित राहत आहे. तरी महापालिका प्रशासनाने येणार्या शैक्षणिक वर्षापासून येथे नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करावेत अशी मागणी साने आणि पालकांनी केली आहे.
विद्यार्थी-पालकांना येणार्या समस्या
– म्हेत्रेवस्ती, मोरेवस्ती, साने चौक आदी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची मुले या महापालिकेत शिक्षण घेत आहेत. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर परिसरातील शाळेत नववी वर्गात प्रवेश घेण्यासाठी हेलपाटे मरावे लागत आहेत. तेथील पटसंख्या पूर्ण असेल तर प्रवेश मिळत नाही.
– जवळच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही तर दुसर्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तरी येण्याजाण्याचा प्रश्न येत आहे. मुलींना शाळेपासून वंचित राहवे लागत आहे.
– खासगी शाळांची फी कामगार, मजूर आणि हातवर पोट भरणार्या सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे प्रवेश घेता येत नाही.