नगर -अखिल भारतीय महात्मा समता परिषदेच्यावतीने ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, उपाध्यक्ष शरद कोके, सावता माळी युवक संघ जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, सावता परिषद जिल्हाध्यक्ष निखिल शेलार आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रमाणात महाज्योती संस्थेकरीता निधी उपलब्ध करुन द्यावा. राज्य मागासवर्ग आयोगावर ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी. शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पदोन्नत्ती बाबत निर्णय घ्यावा. इमाव,विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असून, ती मिळावी. इतर मागासवर्ग विकास महामंडळास वाढीव निधी उपलब्ध करुन द्यावा. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी भागभांडवालात वाढ करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
अनेक वर्षापासून शासनाकडे ओबीसींच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. परंतु सरकार त्याबाबत निर्णय घेत नाही. त्यामुळे ओबीसी समाजात मोठा असंतोष आहे. शासनाने लवकर निर्णय घेतला नाही, तर राज्यभर आंदोलनाचा इशारा मच्छिंद्र गुलदगड यांनी यावेळी दिला.