लोणी काळभोर -हवेली तालुक्यातील ज्या गावांमधील ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे, ते काढण्यासाठी तहसीलदारांमार्फत पीएमआरडीएला प्रस्ताव पाठवून, पीएमआरडीएच्या निधीतून ही अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याची माहिती शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
हवेली तालुक्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली, यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा श्रद्धा कदम, जिल्हा संघटक रमेश भोसले उपस्थित होते.
या वेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाटील वस्ती येथील ओढ्यावरील अतिक्रमणाचा विषय बरेच दिवसांपासून प्रलंबित आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी हवेली तहसीलदारांना एक प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. हा प्रस्ताव पीएमआरडीएकडून मंजूर करून त्या निधीतून तालुक्यातील अशा प्रकारच्या सर्व ओढ्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार कायम शेतकऱ्यांच्या सोबत रहाणार असून, शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे आवाहनही आढळराव पाटील यांनी केले. वळती, शिंदवणे परिसरात ढगफुटी झाली आहे, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेतातील माती, बांधावरील ताली वाहून गेल्या आहेत. या ठिकाणी रेग्युलर पंचनामे सुरू आहेत; परंतु पंचनाम्यांमध्ये माती आणि ताली वाहून गेल्या आहेत अशी नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केले, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळेल.
रस्त्यांची कामे उद्यापासून सुरू
वळती, शिंदवणे येथे झालेल्या ढगफुटीमुळे येण्या-जाण्यासाठी असलेले रस्ते वाहून गेले आहेत. राज्य सरकारकडून योग्यवेळी रस्ते दुरुस्तीसाठी निधी मंजूर होईल. तोपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून तातडीने कच्च्या स्वरूपातील रस्ते दुरुस्त करून घेण्यात येत आहेत. या संदर्भात लागणारा निधी जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी लगेच रोख स्वरूपात तेथे दिला आहे. रस्त्याची कामे उद्यापासून लगेच सुरू होणार आहेत.