शिर्डी – महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या हिंदूहृदयसम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मानबिंदू ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला जोडला जाणारा विकासाचा सुवर्ण त्रिकोण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले होते. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचण्याचा सुखद अनुभव सर्वांना मिळाला. आता या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असून, जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टीने ऐतिहासिक घटना आहे.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरू झाली. आता समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचीही होत असलेली सुरुवात ही जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब ठरेल. दुसऱ्या टप्प्यातील या महामार्गाचा लाभ सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यासह त्या गावातील नागरिकांना होईल. घोटीपर्यंतचे अंतरही कमी होणार असून, या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूकही अतिशय कमी वेळात होईल.
याकडे लक्ष वेधून या महामार्गाची नगर जिल्ह्याची लांबी 29.40 किलोमीटर असून, शिर्डी व नगर परिसरातील कृषी उद्योगांसह इतर व्यवसायांनाही चालना मिळून रोजगारवृद्धीसाठी महामार्गावरील दळणवळण उपयुक्त ठरणार आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज अधिकाऱ्यांसमवेत उद्घाटनस्थळाची पाहणी करून नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, रस्ते विकास व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.