हिमांशू
भूकंप, त्सुनामी, मास्टर स्ट्रोक्स, धक्कातंत्र वगैरे वगैरे सर्वकाही काल दुपारपर्यंत बऱ्यापैकी शमलं. आता धुकं असलं तरी बऱ्यापैकी रस्ता दिसू शकेल असं वातावरण आहे. अर्थात, ते पाच वर्षे कायम राहील याची गॅरंटी नाही. पण प्रवासातल्या अडचणी मागाहून पाहता येतील. आता प्रवास किमान सुरू तरी होईल, अशी आशा करू या. गेल्या महिनाभरात अनेक प्रपोजल एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे, दोन पक्षांकडून, तीन पक्षांकडून राज्यपालांकडे गेली. अनेकदा प्रपोजलचा प्रवास मुंबई ते दिल्ली व्हाया जयपूर असा झाल्याचंही आपण पाहिलं. प्रत्येकजण राजकीय घडामोडींकडे डोळ्यात तेल घालून पाहत होता. या घडामोडींमुळे अनेकांची करमणूक झाली असली, तरी आम्हाला मात्र आमच्यातला उद्योजक जागा झाल्याचा भास होऊ लागलाय. अनेक वर्षांपूर्वी आम्ही उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पण उद्योजक बनू शकलो नाही. “ग्राहक आणि मृत्यू सांगून येत नाही,’ असे अनेक उपयुक्त धडे आम्हाला तिथं दिले गेले; परंतु, व्यवसाय करणं आपलं काम नव्हे, एवढा एकच धडा आम्ही या कार्यक्रमातून घेतला होता. गेल्या महिनाभरात आमच्या डोक्यात एक व्यवसाय घोळू लागला आहे. राजकारण्यांनी ठेवलं नसेल तितकं बारीक लक्ष आम्ही सर्व घडामोडींकडे ठेवलं होतं. त्यातून आम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचत गेल्या आणि त्या जोडल्या तेव्हा एक व्यवसाय आकाराला आला.
आमचं प्रपोजल येणेप्रमाणे- आमचा व्यवसाय हंगामी स्वरूपाचा असेल. मध्यावधी निवडणुका झाल्या नाहीत, तर पाच वर्षांतून एकदाच धावाधाव करावी लागेल; पण चांगला नफा कमावता येईल. हा व्यवसाय बऱ्यापैकी “इव्हेन्ट मॅनेजमेन्ट’ स्वरूपाचा असेल. काही पंचतारांकित आणि सप्ततारांकित हॉटेलांशी करार करावा, असं प्राथमिक नियोजन आहे. त्याचबरोबर ज्या वाहतूकदारांकडे एसी बसेस असतील, त्यांच्याशीही करार केला जाईल. हॉटेलांमध्ये शंभरेक लोकांच्या निवासाची तातडीची व्यवस्था करता येईल. त्याचप्रमाणं एसी बसेस एका फोनवर तातडीनं बोलावून घेता येतील. टीव्ही वाहिन्यांच्या गाड्या आरशात दिसताच त्यांना मार्ग करून देणं आणि त्यांची गाडी बसला समांतर प्रवास करू शकेल, याची काळजी घेणं ही खास कला म्हणून चालकांना शिकवली जाईल. अनेक चारचाकी एसी मोटारी मागेल तिथं, मागेल तेव्हा उपलब्ध करून दिल्या जातील. हॉटेलं आणि वाहतूक व्यवस्था अशा ऐनवेळच्या बाबी मॅनेज करताना कार्यकर्त्यांची खूपच दमछाक होत असेल. त्यामुळं अशा सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणं हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. “निरोपे’ म्हणून काही व्यक्तींची हंगामी निवड करण्याचा आमचा इरादा आहे. त्यांना वाहनं दिली जातील आणि वाहतूक नियमांमधून तात्पुरती सूटही!
कोणत्याही राजकीय पक्षाला केवळ एका फोनवर या सर्व सेवांसह काही “गोपनीय सेवा’ गरजेनुसार उपलब्ध होऊ शकतील. ज्याप्रमाणं खिशात पैसा आहे की नाही, हे न पाहता सामान्य माणूस उत्सव-सण साजरे करतो, त्याचप्रमाणं सर्वच श्रीमंत-गरीब राजकीय पक्षांना हा “सोहळा’ अलीकडे साजरा करावाच लागतो. त्यामुळं सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये आमच्या व्यवसायाचा हळूहळू विस्तार होणार याची आम्हाला खात्री आहे. फक्त प्रपोजल कोणत्या बॅंकेत टाकायचं, एवढाच निर्णय बाकी आहे.