पंढरपूर: पंढरपुरातील आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या शहरात होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी येत्या मंगळवारपासून संचारबंदी लागू करावी, अशी शिफारस पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
1 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्या दिवशी शहारात नेहमीसारखी गर्दी होऊ नये याची दक्षता म्हणून ही उपाययोजना सुचवण्यात आली आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात एकादशीनिमित्त होणारी गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंढरपुरात 30 जून ते 2 जुलै या अवधीत संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या वावरण्यावरही निर्बंध राहणार आहेत.
वारीसाठी केवळ दहा पालख्यांना आणि त्यांच्याबरोबरच्या मोजक्याच लोकांना येथे प्रवेश दिला जाणार आहे. अन्य कोणालाही पंढरपुरात प्रवेश करू दिला जाणार नाही. मंदिर प्रशासनाने संबंधित लोकांना पासेस जारी केले आहेत. हे पास असल्याशिवाय मंदिरात कोणालाही प्रवेश करू दिला जाणार नाही. करोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन तेथे ही उपाययोजना करण्यात आली आहे.