देशात सेल फोन्सचे, सेमिकंडक्टर्स तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने या अर्थ संकल्पात एक नवीन योजना जाहीर केली आहे. देशातील निर्मिती क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या उत्पादनांतील गुंतवणुकही वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे अर्थमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. देशातील प्रत्येक जिल्हा हा एक्स्पोर्ट हब व्हावा असा सरकारचा उद्देश आहे.
गुंतवणुकीच्या प्रकल्पाना राज्य पातळीवरच मंजुरीचे अधिकार देण्याचा सरकारचा विचार आहे असे नमूद करून त्या म्हणाल्या की, गुंतवणुकीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी स्वतंत्र इनव्हेस्टमेंट क्लीअरन्स सेल स्थापन केला जात आहे असेही त्यांनी सांगितले.
देशातील मत्स्य व्यवसाय व दुग्धोत्पादनला चालना देण्याचाहीं सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी ग्रामीण युवकांसाठी सागर मित्र योजना सुरू केली जाणार आहे त्यासाठी मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांच्या पाचशे संघटना स्थापन केल्या जाणार आहेत. देशातील दूध प्रक्रिया क्षमता सन 2025 पर्यंत दुप्पट केली जाणार आहे असेहीं त्या म्हणाल्या.