केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना सौर उर्जा प्रकल्प उभारण्यास प्रोत्साहन देण्याचे ठरवले असून त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोलर पंप बसवावेत यासाठी केंद्र सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाणार असून पुढील आर्थिक वर्षात 20 लाख शेतकऱ्यांना हे पंप बसवण्यासाठी मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांनी पडिक जमीनींवर सौर उर्जा प्रकल्प उभारावेत आणि त्यातील वीज देशातील ग्रीडला विकावी अशीही एक स्वतंत्र योजना आखण्यात आली आहे. मात्र त्यासाठी नेमकी किती आर्थिक मदत दिली जाणार आहे याचा उल्लेख अर्थमंत्र्यांच्या भाषणात नाही.
शेतकऱ्यांना आपल्या शेतात सौर पंप लावण्यासाठी किती आर्थिक मदत दिली जाणार आहे याचाही स्वतंत्र उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केलेला नाही. देशातील पाणी टंचाई असलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी व्यापक योजना आखल्या जात असल्याचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. खत आणि पाण्याचा मर्यादित वापर करून पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असेही त्यांनी सांगितले.
कृषी माल साठवणुकीच्या समस्या काहीं भागात उद्भवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाबार्डला 162 दशलक्ष टन कृषी माल साठवणुकीची क्षमता असलेली गोदामे उभारण्यास सांगण्यात येणार आहे. शेतीच्या लिजींग, मार्केटिंग आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी केंद्र सरकारने जे तीन कायदे केले आहेत त्याचा अवलंब सर्व राज्यांनी केला पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.