ना. अजित पवार यांची उद्योजकांच्या संघटनांना ग्वाही; ना. तटकरेही सकारात्मक
सातारा – राज्यातील उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून राज्य शासनाच्या माध्यमातून ते लवकरात लवकर मार्गी लावली जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आ. रोहित पवार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील उद्योजकांच्या संघटनांची बैठक मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ना. अदिती तटकरे, मुख्य सचिव भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्या उपस्थितीत झाली.
उद्योजकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा झाली. सर्वत्र समान व कमी वीज दर, शेजारील राज्यांच्या तुलनेत दर, उद्योग विस्तार योजना, वाढीव एफएसआय, कामगार राज्य विमा योजना, कचरा निर्मूलन आदी विषय “मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा’ यांच्यामार्फत मांडण्यात आले. त्याला सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला. उद्योजकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली. कामगार विमा योजनेबद्दल प्रधान सचिव, कामगार विमा योजना आयुक्तांसोबत मुख्यमंत्री कार्यालयात बैठक घेण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात एक सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यासाठी अहवाल द्या, निधीची तरतूद करतो, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
कचरा निर्मूलन व वृक्षारोपणासाठी उद्योजक संघटना व उद्योजकांना राखीव भूखंड देण्याची आग्रही भूमिका आदिती तटकरे यांनी मांडली. कामगार राज्य विमा योजनेसंदर्भात कामगार मंत्री दिलीप वळसेगपाटील यांनी “मास’चे प्रभारी अध्यक्ष राजेंद्र मोहिते व सचिव धैर्यशील भोसले यांच्याशी चर्चा केली. या प्रश्नी वळसे-पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे “मास’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
एमआयडीसीचे प्रश्न मार्गी लावणार
सातारच्या औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून लवकरच “मास’ भवनाला भेट देण्याची ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली. याबाबत राजेंद्र मोहिते व धैर्यशील भोसले यांनी मंत्रालयात त्यांची भेट घेतली. सातारच्या औद्योगिक वसाहतीत असलेले उद्योगधंदे ते टिकावेत आणि नवीन उद्योगधंदे यावेत यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यास रोजगाराची अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे मोहिते व भोसले यांनी सांगितले.