नवी दिल्ली – देशांतर्गत उत्पादकांकडून दररोज सुमारे 2.5 लाख पीपीई आणि 2 लाख एन-95 मास्कची निर्मिती करता येऊ शकेल, अशी माहिती कोविड-19 साठीच्या मंत्रीगटाने सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखालील या मंत्रीगटाची आज झालेल्या 14 वी बैठकीमध्ये आरोग्य सेतू ऍपची कार्यक्षमता, परिणाम आणि त्याचे फायदे यासंबंधी विविध बाबींवर चर्चा झाली. पीपीई, मास्क, व्हेंटिलेटर आणि अन्य उत्पादनांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी कठोर उपाय योजनांवरही या बैठकीत भर देण्यात आला.
4 मे पर्यंत जवळपास 9 कोटी लोकांनी आरोग्य सेतू ऍप डाउनलोड केल्याची माहितीही या मंत्रीगटाला देण्यात आली. नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत या ऍपवरून माहिती पुरवली गेली आहे. ज्यांना कोविड-19 ची लक्षणे जाणवत आहेत, त्यांची माहितीही या ऍपद्वारे शोधून काढले जात आहे.
लॅन्डलाईन आणि “आयव्हीआरएस’द्वारे नागरिकांशी प्रादेशिक भाषांमधून संपर्क साधण्याची यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे. त्यादृष्टीने तंत्रज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त केला जात आहे. स्वैर निवडीतून चाचणीसाठी नमुने घेतले जात आहेत. त्या चाचण्यांमध्ये गुणवत्तेचे निकष जपण्यावर भर दिला जात आहे, असेही हर्ष वर्धन यांनी सांगितले.
कोविड रुग्णालये उभारणे, पीपीई, व्हेंटिलेटर आणि अन्य आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
देशात करोनाचे रुग्ण 3.2 टक्के आहेत तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, हे लॉकडाऊनचे एक सकारात्मक लक्षण आहे, असेही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.