नवी दिल्ली – भारतातील करोनाबाधितांच्या संख्येने बुधवारी 51 हजारांचा टप्पा ओलांडला. त्या विषाणूच्या संसर्गाने देशात आतापर्यंत 1 हजार 700 हून अधिक रूग्णांचा बळी घेतला आहे.
जगभरात कहर केलेल्या करोनाचा भारतातील फैलावही चिंताजनक पातळीवर पोहचला आहे. देशात सर्वांधिक बाधित आणि बळींचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. त्याखालोखाल गुजरातचा क्रमांक लागला आहे. त्या राज्यातील बाधितांची संख्या 6 हजार 625 इतकी झाली आहे.
गुजरातमध्ये करोना संसर्गामुळे आतापर्यंत सुमारे 400 रूग्ण दगावले आहेत. दिल्लीतील बाधितांच्या संख्येने याआधीच 5 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर तामीळनाडूत करोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 5 हजारांजवळ जाऊन पोहचली आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांत प्रत्येकी 3 हजारांहून अधिक बाधित आढळले आहेत.
उत्तरप्रदेशातील बाधितांची संख्या 3 हजारांजवळ गेली आहे. मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये करोनाने 150 च्या आसपास बळी घेतले आहेत. भारतात नोंद झालेल्या करोनाबाधितांमध्ये 111 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
बाधित आणि बळींचा आकडा वाढत असला तरी भारतातील स्थिती करोनाने हाहाकार उडवलेल्या इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे. भारतातील सुमारे 15 हजार रूग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण जवळपास 29 टक्के इतके आहे.
करोना फैलाव रोखण्यासाठी केंद्राबरोबरच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची सरकारे वेगाने पाऊले उचलत आहेत. करोना संकटावर मात करण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे.