नवी दिल्ली: रेल्वेने देशभरात 115 श्रमिक रेल्वे गाड्या पाठवून आत्तापर्यंत सुमारे एक लाख स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मुळ राज्यात पोहोचवले आहे अशी माहिती रेल्वे विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. आज दिवसभरात अशा 42 गाड्या ठिकठिकाणाहून रवाना केल्या जात आहेत. मंगळवारी रात्री पर्यंत अशा एकूण 88 श्रमिक ट्रेन्स सोडण्यात आल्या आहेत.या गाड्या 24 डब्यांच्या असून त्यातील प्रत्येक डब्यात 73 प्रवासी बसण्याची क्षमता असली तरी एका डब्यातून केवळ 54 प्रवासीच नेले जात आहेत असेही रेल्वेने म्हटले आहे.
कर्नाटकातूनही अशा प्रकारच्या दहा गाड्या काल सोडल्या जात होत्या. पण येथील कामाला कामगारच मिळणार नाहीत त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्पच राहील या कारणाने कर्नाटक सरकारने या स्थानिक मजुरांना कर्नाटक सोडून जाण्यास मनाई केली. त्यामुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे तेथील स्थलांतरीत मजुरांमधील अस्वस्थता फारच वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.
आत्तापर्यंत सोडण्यात आलेल्या गाड्यांवर रेल्वेने किती खर्च केला ही माहिती रेल्वेने दिलेली नाही.तथापी एक गाडी सोडण्यासाठी सरासरी 80 लाख रूपये इतका खर्च येत असल्याची माहिती आहे. काल मंगळवारी सकाळी गुजरातेतून अशा 35 गाड्या सोडण्यात आल्या असून केरळातून 13 गाड्या सोडण्यात आल्या आहेत. स्थलांतरीत मजुरांना उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, या राज्यातील त्यांच्या मुळ गावी नेऊन सोडले जात आहे. ओडिशातही तेथील मजुरांना घेऊन येणाऱ्या सात गाड्या आत्तापर्यंत त्या राज्यात पोहचल्या आहेत.