नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जबलपूरमधून आपल्या प्रचारास सुरूवात करत मतदारांना ५ मोठी आश्वासने दिली आहेत. त्यासोबतच २२५ महिन्यांत राज्यातील भाजपा सरकारने २२० घोटाळे केले आहेत, असा आरोपही प्रियंका गांधींनी केला आहे.
प्रियंका गांधींनी ग्वारीघाट येथे नर्मदा नदीची आरती करून शहीद स्मारक येथील सभेला संबोधित केले. “प्रत्येक महिन्याला महिलांना १५०० हजार रुपये, गॅस सिलेंडर ५०० रुपयांत दिला जाणार. १०० युनिट पर्यंत विज मोफत मिळणार. २०० युनिटपर्यंत विजेच्या वापरावर अर्धे बिल आकारले जाईल. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार. सरकार आल्यावर १०० टक्के आश्वासनाची पूर्तता केली जाईल. ही आश्वासने कर्नाटकातही दिली गेली होती. सरकार आल्यानंतर सर्व आश्वासने पूर्ण केली,” असे प्रियंका गांधींनी सांगितले.
शिवराज सिंह चौहान सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत प्रियंका गांधी म्हणाल्या, “गेल्या तीन वर्षात केवळ २१ जणांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. जेव्हा ही आकडेवारी मला मिळाली, तर याची सत्यता तपासण्यासाठी माझ्या कार्यालयास सांगितलं. तेव्हा ही वस्तुस्थिती खरी असल्याचं समोर आलं.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे प्रियंका गांधींनी टीका केली. “मध्य प्रदेशातील काही नेत्यांनी सत्तेसाठी पक्षाची विचारधारा सोडली,” असे प्रियंका गांधींनी म्हटले.