नवी दिल्ली – केंद्रात असणारे मोदी सरकार युवकांना रोजगार देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक महत्त्वाचं आश्वासन दिले आहे. जर केंद्रात कॉंग्रेसचं सरकार आलं तर एका वर्षाच्या कालावधीत 22 लाख युवकांना सरकारी नोकरी देण्यात येईल. पुढील वर्षाच्या 31 मार्च 2020 पर्यंत 22 लाख सरकारी पदे भरण्यात येतील असं आश्वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे.
बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस भाजपाला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही घोषणा केली. आता जवळपास 22 लाख सरकारी पदे रिक्त असून जर भविष्यात कॉंग्रेस पार्टी सत्तेत आली तर ही सगळी पदे भरली जातील, असा दावा राहुल गांधी यांनी ट्विट करत केला आहे. याआधीही कॉंग्रेसकडून गरिबांसाठी न्याय योजना घोषित केली आहे.