नवी दिल्ली – पीक विमा कंपन्यांना नफा व तोटा यामध्ये संतुलन राखणारे बीड मॉडेल (80 :110) याचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत व्हावा, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे केली.
कृषी मंत्री भुसे यांनी तोमर यांची भेट घेऊन त्यांना “बीड मॉडेल’ची माहिती दिली. या मॉडेलमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा विचार अधिक केला गेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत याचा समावेश झाल्यास त्याचा लाभ शेतक-यांना होईल. त्यामुळे बीड मॉडेलचा समावेश व्हावा अशी मागणीचे निवेदन त्यांनी दिले. येत्या खरीप हंगामात हे राबविल्यास शेतक-यांना त्याचा अधिक लाभ मिळेल, असे भुसे यांनी बैठकीनंतर सांगितले.
यासह एकात्मिक फलोत्पादन अभियानामध्ये फळबागांसाठी प्लॉस्टकि कव्हर व नेट (जाळी)चा समावेश करावा. तसेच याच योजनेमधल्या घटकांचे मापदंड व्याप वाढवीण्याबाबतची मागणी त्यांनी यावेळी केली. या अंतर्गत कांदाचाळी, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज आदींचा लाभ देण्यात येतो.
याबाबतचे मापदंड 2014 मध्ये निश्चित करण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांकडून याबाबतचे मापदंड बदलून नव्याने तयार करण्याची मागणी असल्याचे भुसे यांनी तोमर यांच्या निर्देशनास आणून दिले. यावर तोमर यांनी राज्यातील कृषी आणि फलोत्पादनाशी निगडित विषयांवर सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिल्याचे भुसे यांनी बैठकीनंतर सांगितले.
राज्यात खरीप हंगामासाठी केंद्राने लवकरात लवकर खते उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय रासायनिक आणि खते मंत्री भगवंत खुबा यांच्याकडे केली.