कोल्हापूर – करोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे. हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
कृषी विभागाची कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची आढावा बैठक कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये, यासाठी राज्यव्यापी नियोजन करण्यात आले असून गरज भासल्यास बफर स्टॉकमधून खते व बियाणे उपलब्ध करुन देण्यात येतील. याबाबतीत गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. दुसरीकडे शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये, जेणेकरुन दुबार पेरणी करावी लागणार नाही, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढीसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन या पिकांच्या उत्पादकता वाढवावी. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजना यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. “विकेल ते पिकेल’ संकल्पनेप्रमाणे मागणीनुसार पिके घ्यावीत.
तसेच कृषी विभागाच्या योजनांचा लाभ महिला शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी 50 टक्के निधी राखीव ठेवण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.