वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीमध्ये रोड शो केला. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याआधी वाराणसीमधील रस्ते धुवून काढण्यात आले. या स्वच्छतेसाठी 1 लाख 40 हजार लिटर पिण्याचे पाणी वापरण्यात आले. वाराणसी शहरातील 30 टक्के घरांमध्ये नळाने प्यायचे पाणी येत नसतानाच इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यानी मोदी वाराणसीत येण्याआधी शहरातील रस्ते धुवून काढण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले होते, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. वाराणसी महापालिकेने मोदी शहरात येण्याच्या आदल्या रात्री पाण्याचे 40 टॅंक आणि 400 कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील सर्व रस्ते चकाचक केले.
अशाप्रकारे केवळ सणासुदीच्या दिवशी वाराणसीतले रस्ते वर्षातून एक दोन वेळा धुतले जातात. स्थानिक प्रशासनाच्या अहवालानुसार शहरातील 70 टक्के घरांमध्येच नळाने पाणी येते. वाराणसीमधील 30 टक्के घरांना पिण्याच्या पाण्यासाठी विहीरींमधील पाण्यावर अवलंबून रहावे लागले.